शिंदेंच नाव आलं अन् मी थेट कार्यक्रमातूनच…भाजप प्रदेशाध्यक्ष होताच चव्हाणांनी सांगितला तो किस्सा

Ravindra Chavan on Eknath Shinde : तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. (Shinde) याबद्दल आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा खुलासा केला आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, त्यावेळी मी इतका नाराज झालो की ते थेट घरी निघून गेले होतो. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र, राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि मोठा धक्का दिला. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं जाहीर करुन टाकलं. या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला वाईट वाटल्याचं म्हटलं आहे.
जयंत पाटील भाजपात जाणार? प्रश्न विचारताच रोहित पवार म्हणाले, सत्तेसाठी ते
याविषयी बोलताना चव्हाण म्हणाले, असा कोणता कार्यकर्ता असेल ज्याला वाटेल की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यावेळी मला असं वाटत होतं की, सत्ता बदल होईल तेव्हा १०० टक्के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेच वाटत होतं. पण जेव्हा राज्यपालांकडे गेलो त्यावेळी इतर कार्यकर्त्यांसारखा मलाही धक्का बसला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यावेळी मला वाईट वाटलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे.
या घटनेचं दुःख वाटल्याने मी घरी निघून गेलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आणि ११.३० वाजता पुन्हा एकनाथ शिदेंसोबत बोलायला लागलो. मला आणि कार्यकर्त्यांना वाईट वाटल्याचं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. त्यामुळे कुणाचा रोष वगैरे असं काही होत नाही. मनात वाटतं ते बोलून दाखवणं हे काही चूक नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.